सातारा, 15 फेब्रुवारी :
‘राज्यात यशवंतराव चव्हाण (yashwantrao chavan) आणि वसंतदादा पाटील (Vasantdada patil) यांनी उभी केलेल्या सहकार चळवळीची मूहुर्तमेढ खाली पाडण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केली’, असा गंभीर आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी केला आहे.

साताऱ्यातील जळगावमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
‘शरद पवार हे राजकारणाच्या पटलावरील बुद्धिमान आणि चांगला माणूस असून त्यांनी शतक मारावं पण शतक मारताना आमच्या लेकराबाळांना मारू नका’ असा सणसणीत टोला देखील सदाभाऊ खोत त्यांनी यावेळी लगावला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकेल ते पिकले या घोषणेची खिल्ली उडवली. ‘राज्यात विजेचा आणि उसाच्या FRP चा प्रश्न ऐरणीवर आल्याने येणाऱ्या अधिवेशनात सरकायला सभागृहात सळोकीपळो करून सोडणार आहोत. त्यासोबत शेतकऱ्यांच्या घरगुती आणि शेती पंपाची वीज कनेक्शन खंडीत करायला आलात तर हातात दांडकी घेऊन उभं राहणार असल्याचा इशाराच सदाभाऊ खोत यांनी सरकारला आणि महावितरण कंपनीला दिला आहे.