कोल्हापूर /प्रतिनिधी
जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका अठरा तारखेला पार पडल्या आहेत. निकालानंतर आता सर्वांच्या नजरा सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लागून राहिल्या आहेत . सरपंच पदाच्या आरक्षणासाठी २७ जानेवारीला आरक्षण काढण्यात येणार असलेचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आहेत.

टोकाच्या ईर्षेने आणि अतिशय चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याच पक्ष , आघाडी व स्थानिक गटांना मिळालेले नाही. बहुमतसाठी सिद्ध करण्यासाठी एक-दोन जागांचा फरक असलेल्या गावांत अपक्षांना आपल्याकडे घेण्याकरिता मोठमोठ्या ऑफर देण्यात येत आहेत.
सरपंचपदाची लॉटरी २७ जानेवारीला फुटणार आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडणार हे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा चुरस वाढणार आहे. सरपंचपदासाठीच्या हालचालींना गती येणार आहे. काटावरील बहुमत असलेल्या गावातील अपक्ष निवडून आलेल्या सदस्यांचा भाव वधारणार असुन त्यांच्या दिमतीसाठी दोन नंबर फळीतील कार्यकर्त्यांवर जबाबदारी पुर्ण आधिकारासह टाकण्यात आलेली आहे. सध्या मात्र अनेक इच्छुकांना हुरहुर लागली असून एक त्यांना आठवड्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे .