मोहोळच्या घाटणे गावची सत्ता तरुणाईकडं, २१ वर्षाचा ऋतुराज सरपंच तर 23 वर्षाची राजश्री उपसरपंच

सोलापूर/प्रतिनीधी

   मागील काही दिवसांपासून राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (Maharashtra Gram Panchayat Election 2021) चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागल्यापासून सरपंच कोण होणार याच्याच चर्चा राज्यभर रंगल्या होत्या. यात सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे येथील २१ वर्षाचा तरुण ऋतुराज रवींद्र देशमुख (Ruturaj Deshmukh) यांनी विजय मिळवत सर्वांत तरुण सरपंच होण्याचा मान पटकवला आहे. तर राजश्री शाहजी कोळेकर ही तरुणी वयाच्या 23 व्या वर्षी घाटणे गावाची उपसरपंच झाली आहे.

  ऋतुराज आणि राजश्री यांच्या निवडीमुळे घाटणे गावची सत्ता तरुणाईच्या हातात गेली आहे. ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतंच त्याचं बीएससीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. नंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. निवडणुकीच्या काळात ऋतुराजनं तयार केलेला वचननामा चर्चेचा विषय ठरला होता. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करून गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज पहिलाच असावा.

  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनलकडून त्यानं निवडणूक लढवली. ऋतुराजनं ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी 5 जण विजयी झाले होते. आता सरपंच पदाची निवडणुकदेखील ऋतुराजनं जिंकली आहे. त्यामुळे ऋतुराज हा सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरला आहे.

error: Content is protected !!