गारगोटी /प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील बेगवडे व आरळगुंडी परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान करत टस्कर हत्ती अखेर आजरा तालुक्यातील वझरे हद्दीच्या दिशेने गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आरळगुंडी व परिसरातील शेती पिकातील नुकसान हत्ती कडून करण्यात आले आहे . बेगवडेतील कृष्णा बुवा यांच्या शेतातील केळीचे नुकसान करून हद्दीतील आरळगुंडी हद्दीतील तुकाराम परीट या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तयार करून ठेवण्यात आलेली भाताचे दहा पोती नुकसान करण्यात आले आहे. हा हत्ती चिकोत्रा नदीतील पाणी पिऊन गुंडू शाहीर , पांडुरंग पाटील , विलास निऊंगरे , तुकाराम निऊंगरे , तानाजी निऊंगरे यांच्या शेतातून भात पिकाचे नुकसान करत गोल्या शेतातून घोळ शेतातून वझरेच्या दिशेने गेल्याचे विलास निऊंगरे यांनी सांगितले. या हत्तीच्या वास्तव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . आरळगुंडी , सावतवाडी , बेडीव ,बेगवडे येथील शेतामध्ये सध्या भात काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असून भुईमूग , नाचना या पिकांचे नुकसान केले आहे .आजपर्यंत गवा रेड्यांच्या नुकसानीतून वाचविण्यात आलेल्या पिकांचे या हत्तीकडून नुकसान होताना दिसत आहे.सदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व जंगली प्राण्यांच्या या त्रासापासून कायमस्वरूपी शेतकऱ्यांची सुटका व्हावी . याबाबत वनविभागाकडुन उपायोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे.