गुगल पे वरून अठ्ठेचाळीस हजारांची फसवणुक ;ओटीपी नंबर सांगितल्याने फटका

पन्हाळा /ता . १९ प्रतिनिधी

           गुगल पे वरून स्वतःच्याच मोबाईल वर 250 रुपयांचे रिचार्ज मारताना तब्बल 48 हजारांचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे . याबाबत संज्योती माणिक नायकवडी यांनी पन्हाळा पोलिस ठाणे व सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे . नायकवडी यांनी आपल्या मोबाईल नंबरवर गुगल पेद्वारे 250 रुपयांचा रिचार्ज मारला होता . पण त्यांच्या बँक खात्यातुन चुकून 2500 / – रुपये कमी झाले .
          याबाबत तसा त्यांना काही मनिटांतच फोन आला व हे 2500 / – रुपये आपल्या खात्यावर पुन्हा जमा केले जातील , असे सांगितले . मात्र त्यासाठी आपल्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर येईल , तो आपण सांगावे . सुरुवातीला नाईकवडी यांनी ओटीपी नंबर देण्यास टाळाटाळ केली .पण 2500 रुपये आपल्या खात्यावरुन कमी होतील , या भितीपोटी त्यांनी ओटीपी नंबर दिला . हा ओटीपी नंबर देताच त्यांच्या मोबाइलवर तीन वेगवेगळ्या सिमकार्ड द्वारे मेसेज आले . त्यानंतर त्यांना आपल्या बँक खात्यातुन 48 हजार रुपये कमी झाल्याचे समजले . दरम्यान तक्रारदार महिलेने ही घटना आपल्या पतीला कळविली . त्यानंतर दोघे पती – पत्नी ज्या बँक खात्यातून पैसे कमी झाले , त्या पन्हाळा येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत गेले . त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली . पण कोणतीही बँक पैसे परत खात्यावर जमा करण्यासाठी ओटीपीची मागणी करत नाही , असे उत्तर त्यांना मिळाले त्यामुळे आपल्या बँक खात्यावरुन 48 हजारांची ऑनलाईन चोरी झाल्याचे त्यांना समजले . त्यांनी तात्काळ पन्हाळा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला . तसेच सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडेही तक्रार अर्ज दिला . एकूणच या घटनेमुळे पन्हाळ्यात खळबळ उडाली आहे . तरी ही चोरी कशा पद्धतीने झाली , याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे .

error: Content is protected !!