रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकीट महागलं !

मुंबई प्रतिनिधी

    मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये पाच पट वाढ झाल्यानंतर आता भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) देशातील सर्वच प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रवाशांना आता सर्व स्थानकांवर 10 रुपयांना मिळणारे प्लॅटफॉर्म तिकीट तीन पट जास्त अर्थात 30 रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी ही ‘किंचित भाडेवाढ’ केल्याचं स्पष्टीकरण यावेळी रेल्वे प्रशासनानं दिलं आहे.

   कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मध्य रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत वाढवली. मध्य रेल्वे (सीआर) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांवरुन 50 रुपये करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि उन्हाळा या दोन्ही बाबी पाहता गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.

    1 मार्चपासून ही दरवाढ लागू झाली असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. सुट्टीच्या हंगाम संपेपर्यंत म्हणजेच 15 जून 2021 पर्यंत मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटाची दरवाढ लागू राहील, अशी माहिती त्यांनी दिली. काही निवडक स्टेशनवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटलं आहे. विशेषतः ज्या स्टेशनवर बाहेरगावी जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसना थांबा आहे, अशा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट दर 50 रुपये करण्यात आला आहे.

error: Content is protected !!