नालासोपारा/ सुर्यकांत देशपांडे
ठाणे जिल्ह्यातील खाडीद्वारे जलवाहतुक प्रवासास पुढील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी प्रारंभ होण्याची शक्यता असुन, त्यामुळे प्रचलित लोकल रेल्वे तसेच महामार्गावरील प्रवासाचा ताण कमी होण्यासह, वेळेचीही बचत होणार आहे.
सध्या या परिसरातील लाखो प्रवाशांना आपल्या नोकरी व व्यवसाय निमित्ताने दैनंदिन प्रवास, लोकल रेल्वे तसेच महामार्गाद्वारे करावा लागतो. त्यासाठी कामाच्या व्यतिरिक्त अधिक वेळ खर्च करण्याबरोबरच वाहतूक कोंडीचा सामना सातत्याने करावा लागतो.
नियोजित प्रस्तावानुसार ठाणे-वसई-कल्याण, तसेच
ठाणे-मुंबई आणि ठाणे-नवी मुंबई अशा जलमार्गीय प्रवास सुरु करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या ३२ किलोमीटर लांबीच्या खाडी किनाऱ्यालगत हा जलमार्ग निश्चित करण्यात आलेला असुन, गेल्या चार वर्षांपासून विचाराधीन असलेल्या प्रस्तावाबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या संदर्भात लवकरात लवकर काम सुरु व्हावे . यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सुचना व आदेश दिलेले असल्याने, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीही आता पाठपुरावा चालविलेला असल्याने सदर जलमार्गावरील प्रवासी वहातुक येत्या जुन २१ म्हणजेच पुढील पावसाळ्यापुर्वी सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.