लसीकरण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोरोना संसर्ग टाळणे शक्य – राज्यमंत्री यड्रावकर ; गडचिरोली जिल्हा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

गडचिरोली / (जिमाका)
   जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे , तसेच प्रशासनाने रूग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच आपण कोरोना संसर्ग टाळू शकतो. असे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर ) यांनी केले. गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटिल, अतिरीक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरीक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटिल, निवासी उपजिल्हाधिकारी तळपडे उपस्थित होते.
  ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेला उद्देशून राज्यमंत्री यांनी संदेश दिला , कोरोना, जिल्हयातील वाढलेल्या आरोग्य सुविधा, शासनाने केलेल्या विविध उपाय योजनांसह आधुनिक शेती, मनरेगामधील कार्य व पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान याबाबत राज्यमंत्री यांनी आपल्या भाषणात मुद्दे मांडले.

   महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्व नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, जिल्हयातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले आज संपुर्ण महाराष्ट्र कोरोना सारख्या एका वेगळया महामारीशी लढत आहे. यासाठी प्रत्येकजण आपआपले योगदान देत आहेत. कोणी दवाखान्यात, कोणी रस्त्यावर तर कोणी घरात राहून. कोरोना महामारीसाठी महाराष्ट्र पुन्हा लढतोय. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून प्रतिज्ञा करूया. तसेच या कोरोना लढ्यात दिवस रात्र काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सलाम करूया.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, जिल्हयात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती झाली . कोरोना काळात जिल्हयात अनेक प्रकारे आरोग्य विषयक सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्हयात आरोग्य सुविधांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सद्या या प्रश्नावर प्रशासनाने मार्ग काढून जिल्हा रूग्णालयापासून ते ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. आयसीयू, शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण सोहळा नुकताच जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. तसेच रूग्णलयातील दंत विभाग, आकस्मिक विभाग, फिजीओथेरपी विभाग, प्रतिक्षालय, औषधी भांडार आणि सुसज्ज वस्त्र धुलाई उभारणीसाठी कामे केली आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय हे जिल्हयातील प्रमुख व एकमेव संपुर्ण आरोग्य सेवा देणारे माध्यम आहे. याचे अधिक सोयीसुविधांनी नुतनीकरण केले जात आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांचे बळकटीकरणही केले जात आहे.
    जिल्हयात कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू केलेल्या अल्पदरातील शिवभोजन थाळीतून चाकरमान्यांना यावेळी मोठया प्रमाणात फायदा झाला. आता कोरोना काळात ती मोफत स्वरूपात वाटप करण्यात येत आहे. जिल्हयात शेतीमध्येही दुबार पिक पध्दत घेण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिल्यास जिल्हयातील शेती अधिक प्रगतशील होईल. यासाठी धान शेतीबरोबर व नंतर इतर पीक पध्दती शेतकऱ्यांनी आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. करडई, ज्वारी, अगदी स्ट्रॉबेरी सुद्धा जिल्हयात लागवड केली जात आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट

   राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर ) यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लसीकरण, रूग्णांवरील उपचार, औषधांचा पुरवठा व ऑक्सिजन पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ.सोळंखी, डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.बागराज दुर्वे उपस्थित होते.  

error: Content is protected !!