कोल्हापूर/ प्रतिनिधी
बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सक्तीने सात दिवस संस्थात्मक अलगीकरण केंद्रात रहावं लागेल, गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र सोय असेल तर त्याची खात्री करून ठेवता येईल असा निर्णय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. नियम न पाळल्यास त्यांना दंड करा असे आदेशच देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचे रूग्ण कमी होते. पण, मे व जून महिन्यात मुंबई, पुणे, नाशिक, यासह इतर अनेक जिल्ह्याबरोबरच इतर राज्य व परदेशातील लोक कोल्हापुरात आले. ते आल्यानंतर संसर्ग वाढला. रोज केवळ शंभर ते दोनशे असणारा करोना रूग्णांचा आकडा रोज दोन ते अडीच हजारापर्यंत पोहोचला. या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे जवळजवळ चार लाख लोक बाहेर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ते परतले होते. आताही तीच स्थिती आहे. सध्या मुंबई व पुण्याहून मोठ्या प्रमाणात मूळ कोल्हापूरकर परतत आहेत. त्यांच्यामुळे करोना वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रभाग व गाव समितीने सतर्क रहावे, करोना संसर्ग होणार नाही यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची, आदेशांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी देसाई म्हणाले.
छत्रपती राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या सर्वांची आज बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. ऊषादेवी कुंभार, तहसिलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी सुरूवातीला सद्यस्थितीबाबत माहिती देवून सूचना केल्या. ते म्हणाले, गृह विलगीकरणात आरोग्य सेवकांच्यामार्फत दैनंदिन तपासणी झाली पाहिजे. पूर्वीप्रमाणेच पल्स ताप याबाबत नोंदी ठेवायला हव्यात. त्याचबरोबर गृह विलगीकरणासाठी घरामध्ये स्वतंत्र व्यवस्था असल्याची खात्री करायला हवी. घराच्या बाहेर त्याबाबत फलक लावला पाहिजे. गाव पातळीवर ग्राम समित्यांमार्फत संस्थात्मक अलगीकरण कार्यान्वित व्हायला हवं. प्रतिबंधीत क्षेत्रात इली,सारी याबाबत सर्वेक्षण करायला हवे. त्याबाबत सूक्ष्म स्तरावर नियोजन करा.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सरपंच, सदस्य, नगरसेवक, सर्व अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील या सर्वांचे मी अभिनंदन करतो. सद्यस्थितीत सुमारे दररोज ३८ हजार लसीकरण होत आहे. यामध्ये आणखी लसीकरण केंद्र सक्रिय झाल्यास ४५ पुढील सर्वांचे लसीकरण महिनाअखेर पर्यंत संपू शकते. बाहेरून आलेल्या व्यक्तींना अलगीकरण केंद्रात ठेवा असे आवाहन करून ते म्हणाले, नियमांचे तसेच आदेशाचे कुणी पालन करत नसेल तर दंडात्मक कारवाई करावी. कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर द्या. गट विकास अधिकारी, तहसिलदार यांनी तलाठी, ग्रामसेवक यांना गावं वाटून द्यावीत. सामाजिक जाणीव आणि जबाबदारी म्हणून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचे काम करावे, असेही ते शेवटी म्हणाले.
