कबनूर ( तालुका हातकणंगले) येथील कोल्हापूर रस्तावरील ओढ्या नजीकच्या स्मशानभूमीमध्ये तात्काळ शवदाहिनी बसवण्यात यावी अशी मागणी राजर्षी शाहू महाराज कबनूर नागरिक मंच यांच्यावतीने करण्यात आली.या बाबतचे निवेदन सरपंच शोभा पोवार व ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांच्याकडे देण्यात आले.यावेळी स्मशानभूमीत शव दाहिनी बसवा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला.
येथील शवदाहिनी काही दिवसापूर्वी चोरीला गेली आहे. शवदाहिनी नसल्याकारणाने अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सध्या पावसाळा सुरु असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ शवदाहिनी बसवावी अशी मागणी होत आहे. येत्या आठ दिवसात शवदाहिनी ग्रामपंचायत कडून न बसवल्यास राजर्षी शाहू महाराज नागरिक मंचतर्फे आमरण उपोषण,रास्ता रोको यासारखे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर कबनूर नागरिक मंचचे अशोक पाटील,मिलिंद कोले, महावीर लिगाडे,रियाज चिकोडे,महेश शिवुडकर,श्रीकांत कांबळे,युवराज कांबळे,अल्ताफ मुजावर आदींच्या सह्या आहेत.
