हातकणंगले /ता : ९

कोरोना महामारीच्या काळात ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे . त्या गावात शासनास योग्य व्यक्ती वाटेल त्याची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढलेला आहे. योग्य व्यक्ती कोण याची व्याख्याच अध्यादेशामध्ये नसल्याने पाच वर्ष गावगाडा चालविणारे सरपंच , उपसरपंच सदस्य हे अयोग्य आहेत काय? असा सवाल माणगावचे लोकसेवक राजू उर्फ अभय मगदूम यांनी केला आहे . अध्यादेशाबाबत पुनर्विचार करण्याची लेखी मागणी राज्यपाल भगत सिंह कोषारी ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राजु मगदुम यांनी केली आहे
राज्यातील १९ जिल्ह्यातील १५६६ ग्रामपंचायतीची मुदत जून २०२० अखेर संपलेली आहे . तर डिसेंबर २०२० अखेर १२६६८ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे . कोरोनाच्या महामारीमध्ये निवडणूक घेण्याबाबतचे कोणतेही आदेश आयोगाने दिले नसल्याने गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा अध्यादेश शासनाने काढल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे . गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य रात्रंदिवस झटून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरले असताना यापेक्षा गावात योग्य व्यक्ती शोधण्याची जबाबदारी शासनाने घेऊन चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे अयोग्य ठरविलेले असुन गावचा सुरळीत सुरू असलेले कामकाज बिघडविणेचे काम शासन करीत आहे . त्याच बरोबर अध्यादेशामध्ये योग्य व्यक्तीची व्याख्याच शासनाने नमूद केली नसल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधी गोंधळून गेले आहेत .