इचलकरंजी /ताः ७

इचलकरंजी व परिसरातील इंजिनिअरिंग उद्योजकांवर लादलेला एकतर्फी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय हटविण्यात यावा . अशी मागणी उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे यांनी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की , इचलकरंजी येथे वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीवेळी उपस्थित असणाऱ्या आठ ते दहा व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत . त्यामुळेच इचलकरंजीतील रुग्णांची संख्या वाढली आहे . त्याची जबाबदारी निश्चित न करता सरसकट लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे . इचलकरंजीसह आसपासच्या गावांमध्ये 2000 इंजीनियरिंग उद्योगधंदे आहेत . तेथे सर्व नियम पाळून व 50% कामगार कामावर ठेवून परवानगी दिलेली आहे . तसेच ३ जुलै रोजीच्या जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकांप्रमाणे कामकाज सुरु आहे . त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव , कागल , शिरोली , जयसिंगपूर , व लक्ष्मी वसाहत येथील सर्व एमआयडीसीमधील कारखाने सुरू आहेत .इचलकरंजी सह परिसरातील कारखान्यांमधून तयार होणारे काही महत्वाचे पार्टस् देशाच्या संरक्षण विभागासाठी लागणाऱ्या सामुग्रीसाठी तयार होऊन जात असतात . त्यामुळे याचा फटका देशासह उद्योजकांना व कामगारांना होत आहे . तरी वाढलेले कोरोनाचे रुग्ण आणि इंजिनिअरिंग व्यवसाय याचा काहीही संबंध नसल्याने लॉकडाऊन हटविण्याची मागणी केली आहे