मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर/ प्रतिनिधी
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रद्द केल्यावर खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मागणी केली आहे की, मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजे म्हणतात, “मराठा समाजासाठी हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतोच, परंतु मराठा समाजाला आरक्षण पाहिजेच अशी समाजाची भावना आहे. ते कसे मिळवून द्यायचे? याबाबत राजकीय नेत्रृत्वाने मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे मार्ग काढणे गरजेचे आहे. ती सर्वस्वी जबाबदारी आपणा सर्वांची आहे. राजकारण बाजूला ठेवून या पेच प्रसंगातून मार्ग करण्यासाठी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका मी कायम घेतली होती आणि यापुढेही घेत राहीन. माझ्यासाठी हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे. कारण वंचित मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत मराठा समाजाने या राष्ट्रासाठी आजपर्यंत सर्वोच्च त्याग केला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी ज्या मराठा समाजाला बहुजन समाजासोबत आरक्षण देऊन सर्व बहुजनांना एका छताखाली आणले होते, अशा मराठा समाजावर अन्याय करून चालणार नाही.